श्रावणातली व्रतं वैकल्ये संपणाच्या मार्गावर असतानाच गृहिणींना वेड लागते गौरी-गणपतीच्या आगमनाचे ! आमच्या लहानपणी गौरीमाहात्म्य मोठे. अजूनही आहे. घरात ठेवलेल्या पितळेचे गोंडस मुखवटे बोचक्यातून काढायचे. पहिले रांगोळीने उजळायचे. मग चुना, कोळसा या रंगांनी डोळे सजीव माणसा सारखे दिसायचे आणि ओल्या लाल रंगाने ओठ रंगले की गौरी माहेरी यायला सज्ज/तयार व्हायच्या.
अंगणात तुळशीपासून पूजास्थापनेच्या घरातल्या जागेपर्यंत सडा रांगोळ्यांनी घर सजवण्यात येयचे . लक्ष्मीच्या रांगोळीची पावले आणि ओल्या हळदी-कुंकवांच्या हातोप्याने गौरींचा रस्ता सुशोभित करण्यात येयचा. तुळशीपासून डोईवर खणाने झाकलेले मुखवटे प्रत्येक रांगोळीच्या पावलांवर टेकवीत सवाष्णींनी अदबशीर घरात आणायचे. दर टप्प्यावर – ‘लक्ष्मी आली, सोन्याच्या पावली’ हा मंत्र बायकांच्या मनातून उत्साहाने निघतो. गौरीला प्रथम चूल – भानवशीजवळ न्यायचे – एकजण म्हणे,
‘गौरी गौरी, काय पाहतेस?’
उत्तर यायचं, ‘चूल-भानवस!’ – करीत करीत मग दूधदुभते, गाई-गुरांचा गोठा, धान्याची कोठारे (डबे), घरातल्या सोन्या-रुप्याच्या (असल्यास) तिजोऱ्या, कपाटे, पेट्या…असं सगळं घर फिरून झालं की गौरी मुख्य जागी स्थानापन्न व्हायच्या.
‘‘लाडके गौराय कधी येसी
पानी पडलं नय भारलं
भादव्याला येणं
को-या सुपात येणं
झणकत येणं’’
खांद्यापर्यंत आकाराच्या एक-दीड फुटाच्या साड्या नेसवलेल्या साचांवर गौरीचे मुखवटे चढवले की प्रत्यक्ष गौरी प्रकट व्हायच्या. काही ठिकाणी नारळाला/तांब्याला कुंची घालून बाळं ठेवतात. मग पुढचे दोन-अडीच दिवस या माहेरवाशिणींच्या कौतुकात घरातल्या सासुरवाशिणी आणि खास गौरींसाठी आलेल्या माहेरवाशिणी रंगून जायच्या. रोज सकाळ-संध्याकाळ फुले, गजरे, आरत्या , नैवेद्याच्या परोपरी आणि मुख्य म्हणजे गौरींची प्रत्यक्ष रूपे आणि आजूबाजूची सजावट यात बायकांच्या पारंपरिक कला दाखविणेयाची हे खरी वेळ. अजूनही थोड्याफार फरकाने ज्या घरी गौरी गणपती बसतात, त्या बहुसंख्य घरांत असंच खेळीमेळीचे वातावरण असतं. गौरींचा उत्सव प्रामुख्याने स्त्रीप्रधान!
गौरी अनुराधा नक्षत्रावर येत असल्या, तरी तिचा दिग्विजयी पुत्र मात्र तिथीनुसार चतुथीर्च्या दिवशीच आलेला असतो. आणि प्रत्येक ठिकाणी गौरी माऊलीआपल्या पुत्राला सोबत घेऊन जाते. ज्या घरी गौरी पूजनाची प्रथा नसते तिथे मात्र गणपतीचा मुक्काम हा गौरीगणपतीच्या विसर्जनानंतही असतो . २, ४, ६, ११ किंवा २१ दिवसही श्रद्धेपोटी गणपती घरात ठेवला जातो.
ज्येष्ठागौरी कथा ज्येष्ठागौरी आख्यायिका आणि इतिहास
शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य उजळीत करण्यासाठी प्रार्थना केली. त्याचे अनुवर्तन गौरीने असुरांचा सर्वनाश केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुख प्राप्त केले.महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे ; म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.
गौरी आवाहन (दिवस पहिला)
हिंदू शास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी माता हे महादेवाच्या शक्तीचे आणि गणपतीच्या आईचे रूप मानले गेले आहे. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील स्तिथ असलेले नीलकंठेश्वर मंदिरात आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून गौरी आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या आहे त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरींचे मुखवटे घरात आणतात. त्यावेळी वाजत गाजतं गौरी घरत प्रवेश करतात. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची पारंपरिक प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून वैभव नांदो अशी मनोभावे प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांचे चित्र बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून त्यांची दागदागिन्यांनी सजवतात करतात .पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे , विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात ही पद्धत आहे.
गौरीपूजन (दिवस दुसरा)
दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींगणपती ची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी व दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात धाकविला जातो . नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ नैवेद्यात केले जातात . केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत आधीपासून चालत आली आहे.
कोणत्याही प्रदेशात आणि जातीजमातीत सोळा प्रकारच्या भाज्या हव्यातच! त्यात अनेक पालेभाज्या आणि दुधी भोपळा अशा वेलभाज्या! भरपूर येतातच ना त्या पावसाळ्यात! मग गोडाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी, कोकणात घावन-घाटले असते व काही ठिकाणी चक्क तिखट (समाविष्ट ) असते . जुन्या रीतीप्रमाणे काही समुदायात मद्यही आवश्यक! काहीच नसेल तर जमातीचा ‘पुरोहित’ (तिखट) नैवेद्यावर चार थेंब मद्य शिंपडणारच!
विदर्भातल्या गौरींचा (लक्ष्म्यांचा) नैवेद्यही वऱ्हाडी अघळपघळ प्रवृत्तीसारखाच! जोंधळ्याची आंबील हवीच! बहुधा गोड. कधी तिखट–खारी. तीही सत्यनारायणाच्या प्रसादासारखी सव्वा पटीत! सव्वा पावशेर/शेर/पायली! आंबील शिजवलेलं मोठ्ठं पातेलं तसंच लक्ष्म्यांपुढे! मग पुरणपोळी, १६ भाज्या वगैरे आहेच! जेवायला खूप लोकांना बोलवायचं. आंबिलीचे पावित्र्य मोठे. इथे तिथे हात धुवायचा नाही- अंगणात एका खास खड्ड्यातच हात धुवायचे! ‘समुद्र’ म्हणतात त्याला. नंतर तो खड्डा बुजवायचा! हळदी-कुंकवाला येणारी प्रत्येकजण लक्ष्मीची खणा-नारळांची ओटी आणि ऐपतीनुसार धान्य घेऊन येणार! पुन्हा गृहिणीने ती सगळी ‘रास’ घटस्थापनेपूर्वी घरातच पै-पाहुण्यांसाठी पदार्थ खाऊ घालूनच संपवायची. उचलून घराबाहेर काही न्यायचं नाही.
अनेक ठिकाणी नैवेद्याच्या वेळी कणकेचे १६, कुठे ३२ दिवे आणि मुठे करून केळीच्या पानाभोवती ठेवायचे! नैवेद्य केळीच्या पानावरच वाढायचा. नैवेद्य दाखवून झाला की त्या खोलीचं दार काही काळ बंद ठेवतात. आत लक्ष्म्या जेवतात ना! दार उघडलं की बारकाईनं पान बघायचं. कोणकोणते पदार्थ उष्टावले गेलेत? सगळी गंभीर गंमत!
एक संकेत मात्र सगळीकडे! गौरी, लक्ष्मी घरात असेपर्यंत घरातला पैसा बाहेर द्यायचा नाही.
विसर्जन (दिवस तिसरा)
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एकत्र गाठी घालावायत. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल ह्या महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची दुःख दिसून येते. गौरींची पूजा,आरती करून पुढील वर्षी घरी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. (धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर थोडी थोडी टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी व सुख नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत भाविकांची आहे .
दोरकाची पूजा
या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण समाजात गौरींच्या पूजेबरोबरच गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो १६ गाठी चा गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत तो गळ्यात ठेवतात. अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी असे समजतात.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
जेष्ठागौरीची मराठी कथा व आरतीचे महत्व जाणून घेण्या साठी येथे क्लिक करा